महादरावाजा गडाचे दर्शनी अंग-नवनाथ आहेर


                महादरवाजा

   'दरवाजा' हे गडाचे मुख्य व दर्शनिय अंग.दरवाजाच्या रचनेवर त्या राजसत्तेच्या वैभवाचे अकलन होत असे.म्हणूनच,दरवाजाच्या दर्शनी भागावर कमळ,शरभ,गजलक्ष्मी,गंडभेरुड,धन्याचे कणिस आदि शक्तिदर्शक व समृद्धीदर्शक शिल्पांची स्थापना आपणांस गडांवर पहावयास मिळते.किल्ले सुधागडाचा हा मुख्य म्हणजेच महा दरवाजा होय.राजधानी रायगडाच्या महादरवाजाशी साधर्म्य दाखवणारा.रायगडा प्रमाणेच याही दरवाजाची बांधणी हि "गोमुखी" पद्धतीची आहे.दोन महाकाय बुरुजांमध्ये अलगद लपवलेला हा दरवाजा आहे.या दरवाजाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा दरवाजा पुर्ण पणे कातळात कोरलेला आहे.या दरवाजाची रुंदी ८.५ फुट तसेच उंची हि १५ फुट आहे.रायगडाच्या महादरवाजापेक्षा हि उंची फक्त ६ इंचाने कमी आहे.आपल्या हिंदू धर्मात कमळ पुजनिय आहे. त्यामुळे ते दरवाजाच्या दर्शनी भागावर कोरले जाते.त्याच प्रमाणे या ही दरवाजावर दोन सुबक कमळे कोरलेली आहेत.त्याच प्रमाणे दोन शरभांची शिल्पे कोरलेली आहेत.शरभ हा एक काल्पनिक महाकाय प्राणि असून. शरभ म्हणजे त्या गडावर राज्य करणारा शासनकर्ता राजा व त्याने पायात पंजाने पकडलेले हत्ती म्हणजे, इतर प्रतिस्पर्धी शाह्या आहेत.त्यांच्यावर विजय मिळवून आनंदाने या सबंध परिसरावर तो शासनकर्ता राज्य करतो आहे.असा त्याचा अर्थ होतो.त्याच प्रमाणे महादरवाजावर वरच्या बाजूस सुबक कमान आहे.दरवाजाची महिरप तसेच, पाण्याचा निचरा होण्यासाठी छान योजना तसेच रात्रीच्या पहार्यासाठी मशाली, पलुते अडकविण्याची सोय आहे.दरवाजाच्या उंबर्यातून पाणी जाण्यासाठीची योजना केलेली आहे.या दरवाजातील हा मार्ग पुढे धोंडसे गावात जातो.बर्याच अंतरापर्यंत पायर्यांचे अवशेष दिसतात. सर्वभक्षी काळाच्या ओघात व वरील पाणलोट क्षेत्राने या पायर्या वाहून गेल्या आहेत.वरील पाणलोट क्षेत्राने हा महादरवाजा पुर्णपणे मातीत गाडला गेला होता.ट्रेक क्षितीज या संस्थेने व पंचकृषीतील ग्रामस्थ तसेच शाळांनी या महादरवाजास मोकळा श्वास देण्याचे अनमोल कार्य केल आहे.मागिल तीन वर्षात बा रायगड परिवाराने उर्वरीत माती साफ केली आहे.पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके लागते.त्याला तानाजी टाक म्हणतात.त्या जवळ एका विराची मुर्ती तसेच एक हनुमानाचेही शिल्प आहे.त्याच प्रमाणे तानाजी टाक्याच्या मागेच सुधागडच्याच कड्यात काही गुहा सदृश लेणी देखील आहेत.

    किल्ले सुधागड हा कोकणातून देशावर चढणार्या घाटवाटांचा रक्षक किल्ला होय.या महादरवाजातून ते पुढिल तानाजी टाक्याजवळून पुर्वेला  एक अनघड वाट पुढे जाते.ती वाट घाटावर चढणार्या अनुक्रमे वाघजाई व सवाष्ण घाटाने वरती तैल बैला किल्ल्याच्या काहीशा जवळ वर निघतात.वाघजाई घाटाच्या तोंडाला वाघजाई देवीचे एक अनघड ठाणे आहे.हे दोनही घाट हे पुर्वीचा वाहतूकीचे किंवा ये जा करण्याचे  मार्ग होते. त्या ठिकाणी आजही रस्त्यांचे अवशेष पायर्या तसेच पाण्याची टाक  शिल्लक आहेत.तसेच या मार्गावर वाघजाई व सवाष्ण घाटाच्या मध्ये पुर्वीच्या कालखंडात कोरलेली ठाणाळे लेणी आहेत. 

-नवनाथ आहेर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी